केंद्र सरकारच्या ‘या’ उपक्रमांतर्गत मिळेल शेतकर्यांना 50 टक्के अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना
नवी दिल्ली: नवीन कृषी कायद्यामुळे केंद्र सरकारला देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा विरोध पत्करावा लागला होता. अजूनही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.
दरम्यान, दुसरीकडे केंद्र सरकार शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकर्यांनी शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा वापर करावा यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील आहे. आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर हा एक महत्वाचा भाग मानला जातो. अनेक शेतकर्यांना ट्रॅक्टर घ्यायचे असते मात्र आर्थिक अडचणींमूळे ट्रॅक्टर विकत घेणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकर्यांना ट्रॅक्टर विकत घेता यावा यासाठी केंद्रसरकारने शेतकर्यांच्या मदती साठी ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान शेतकरी ट्रॅक्टर योजना असं आहे.
जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?
पंतप्रधान शेतकरी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत केंद्रसरकार शेतकर्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठे अनुदान देत आहे. या योजनतेतील सर्वात विशेष बाब म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर विकत घेऊ शकतील आणि ते ही फक्त अर्ध्या किंमतीत. उरवारीत अर्धे पैसे केंद्र सरकारकडून देण्यात येतील. तसेच अनेक राज्य सरकार आपआपल्या स्तरावर अगोदरच शेतकर्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देत आहेत.
योजनेचा लाभ कसा घ्याल?
एक ट्रॅक्टर खरेदी करणार्या शेतकर्यालाच या योजनेचा लाभ घेता येईल. फक्त एका ट्रॅक्टरसाठीच ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सहज आहे. याकरिता शेतकर्याला जमिनीचे कागदपत्र, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साइजमधील काही फोटो इत्यादि दस्तावेजांची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेऊन जवळच्या कोणत्याही CSC सेंटरवर जाऊन अर्ज करता येईल.