महागाई मुद्द्यावर ‘या’ दिग्गज नेत्याची मोदी सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…
नवी दिल्ली: देशात वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, महागाई दर वाढतच आहे. इंधन दर, घरगुती गॅसचे दर आणि खाद्यातेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच कोरोना संसर्गामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. या सर्व बाबींमुळे सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येत आहे.
कॉंग्रेसची महागाई विरोधात राष्ट्रव्यापी प्रचार मोहीम
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावर प्रचार मोहीम आखली आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी सर्व राज्यातील पदाधिकार्यांना पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या धोरणांवर शरसंधान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला आहे. इंधनांपासून ते खाद्यतेलांच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असल्याची टीका त्यांनी केली.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाई हा महत्वाचा मुद्दा असेल
पुढील आठवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात कॉंग्रेस महागाईच्या मुद्द्यावर आक्रमक राहणार असल्याचे संकेत चिदंबरम यांनी दिले. तसेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.
देशातील महागाईला केंद्र सरकार मधील काही मंत्री मागील यूपीए सरकारला जबाबदार ठरवतात. मात्र प्रत्यक्षात महागाईला सध्याचे सरकारच जबाबदार असलायचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. परदेशातून आयात होणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी कराव्या आणि त्यावरील जीएसटी ही कमी करावे, अशी सूचना त्यांनी केली.
रिजर्व बँकेने उद्दीष्ट ठरविलेल्या महागाई दरापेक्षा जास्त महागाई
आरबीआय ने महागाई दरचे उद्दीष्ट 4 टक्के ठरविले होते. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या महागाई दर 6.26 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.