स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं पाहायचं वाकून हे सोडून द्या, नितेश राणेंची महाविकास आघाडीच्या ‘या’ मंत्र्यावर खोचक टीका
मुंबई: राज्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती मुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. आता मदतीसाठी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं दिसतंय. केंद्र सरकारने 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी तब्बल 701 कोटींचे पॅकेज दिले आहे, मात्र या वर्षी झालेल्या सध्याच्या नुकसानाबाबत केंद्राने अद्याप मदत पॅकेज जाहीर केले नाही.
या पार्श्वभूमीवर महिविकास आघाडीचे मदत व पुनर्वसनमंत्री आणि कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर टीका केली. त्यांच्या टीकेला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय.
नितेश राणे यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे साहेबांना पूरपरिस्थितीची पाहणी करण्याची परवानगी दिली आणि त्यानुसार राणे साहेबांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच राणे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी जी माहिती दिली त्या आधारेच केंद्राने तातडीची 700 कोटींची मदत राज्याला पाठवली आहे.”
“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी रुपये तरी पाठवले तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले हे विजय वडेट्टीवारांनी सांगावं. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याच पाहायचं वाकून हे त्यांनी सोडून द्यावं.’ अशी खोचक शब्दात टीका नितेश राणे यांनी केली.
अजित पवार यांनी पूर्ण परिस्थिती स्पष्ट झाल्यावरच राज्य सरकार नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पूरग्रस्त भागातील लोकांना अजूनही काही दिवस वाट पहावी लागणार आहे.